पुस्तकाचे नाव : बालकांड ,
लेखक : ह मो मराठे
म्याजेस्टिक प्रकाशन
पाने: ३३२
बालकांड वाचल आणि सुन्न व्हायला झालं. एखाद्याचं आयुष्य असही असू शकत याची सर्वसामान्य माणसाला कल्पनाही करता येणार नाही असं उतार चढावानि भरलेलं आयुष्य किंबहुना त्या आयुष्याचा एक छोटा कालखंड लेखकाने ह्या पुस्तकात लिहिला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे त्यांचे आत्मचरित्र नव्हे ,कादंबरीही नव्हे त्याला ते आत्मकहाणी म्हणतात. बालकांड हि त्यांच्या बालपणीची खरीखुरी गोष्ट आहे. त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी हि कथा सुरु होते व बाराव्या वर्षी संपते असे असले तरी मराठी साहित्यातील एक अत्युत्कृष्ट अशी साहित्यकृती लेखकाने निर्माण केलेली आहे ह्यात वाद नहि.
ह्या पुस्तकाबद्दल काही लिहिण्याच्या आधी माझ्या हातात ह. मों. च न लिहिलेले विषय हे छान पुस्तक आल त्यात त्यांनी ह्या पुस्तकाबद्दल फार समरसून लिहिलंय म्हणजे निर्मितीप्रक्रिया व त्यानंतरचे अनुभव वगैरे त्यामुळे त्यांच्याच शब्दात इथे वर्णन देण्याचा मला मोह आवरत नाहीये त्यापेक्षा असा म्हणेन कि चांगले शब्द सापडत नाहीयेत त्यामुळे ह्या पुस्तकाबद्दल त्यांच्याच शब्दात (पुस्तकातून)त्यांनी सांगितलेली काही माहिती मी इथे देतोय :
माझी कथा बालकांड मध्ये आहे पण ती केवळ माझी एकट्याची नहि. माझे वडील ,आई,भाऊ ,इतर भावंड,झाडंपेडं ,परिसर यांचीसुद्धा हि गोष्ट आहे. माझ्या बालपणीच्या गोष्टीत ह्या सर्वांची गोष्टपण गुंफली गेली आहे अनेक पात्रांची मिळून ती गोष्ट झाली आहे. एका कुटुबांच्या उध्वस्त होण्याची,हाल अपेष्टांची ,काही स्वभाव्जन्य दोषांतून निर्माण झालेल्या अनर्थ परंपरां ची आणि नियतीच्या अदृश्य अशा काळाशार सावलीचीही ती गोष्ट झाली आहे.
हि गोष्ट पाच सहा ठिकाणी घडते क़ोकणातल्या सावंतवाडीच्या जवळचं झोळम्ब नावच खेडं, गोव्यातल सुर्ल नावच खेडं ,तिथली तेलबांध नावाची वाडी,गोव्यातल नानोडा गाव,नरसोबाची वाडी अशा ठिकाणी हि गोष्ट घडते.
त्यांचे वडील(ते त्यांना काका म्हणत ) झोळम्बे गावी माडा पोफळीची बाग वसवून होते त्या जमिनीत रात्रं दिवस कष्ट करून त्यांनी ठिकाण उभ केला होतं. झाडा पेडाची लागवड केली,उत्पन्न घेतल ,उपजीविका केली .स्वभ:व विचित्र,तापट. त्यांच्या स्वभावाचं एक चक्र असे दर दीडदोन वर्षांनी अतिउत्साही मनस्थिती तर दीडदोन वर्षांनी आत्यंतिक नैराश्य.त्याचा लेखकाच्या व त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यावर फार परिणाम झाला. शेजाऱ्या पाजारयान्शी भांडणं ,गावकर्यांशी भांडणं,जुगार खेळण,बाई ठेवण,तीर्थयात्रा असे सगळे (परस्परविरोधी)प्रकार त्यांच्या वडिलांनी केले.
गावातील जमिनीच्या वादावरून त्यांनी चक्क गाव सोडून जायचा निर्णय घेतला सगळे सामान-सुमान लिलाव करून विकून टाकले . बाग अशा माणसाला विकली कि ज्याने पैसे देखील वेळेवर दिले नहित. व मोजक्या सामानानिशी व कुटुंबाला घेऊन तीर्थयात्रा करत ते सुर्ल या ठिकाणी आले. तिथे त्यांच्या आईला गंभीर व विचित्र अशा दुखण्याने घेरले .ति किंचाळू लहाली भुंकू लागली .दुखन विकोपाला जाऊन त्यातच ती हाल हाल होऊन वारली .त्याआधी त्यांची तीन चार महिन्यांची नवजात बहिण तीर्थयात्रा करतानाच वारलि.
त्यानंतर त्यांचे वडील दोघा मुलांना घेऊन नरसोबाच्या वाडीला गेले व दारोदार माधुकरी मागून त्यांनी वर्ष काढल. त्यानंतर पुन्हा सुर्ल व तेथे दार व भिंती नसलेल्या झोपडीत (खोपीत)ते राहायला लागले.त्य काळात खायला असल तर असल नाहीतर नाही अशी स्तिथी होती. जवळ पैसे नाहीत ,कर्ज झालेलं अशा परिस्थितीत रानातल्या कडु कंदमुळा वर गुजराण करीत त्यांनी दिवस काढले. सुर्ल्याला काही होत नाही बघून ते पुन्हा झोळम्ब्याला आले तेथे उन्हाळ्याच्या दिवसात राहण्याची काही सोय नसल्यामुळे एका मोठ्या आंब्याच्या झाडाखालीच राहू लागले.
दरम्यानच्या काळात वडिलांच्या विक्षिप्त पणाला कंटाळून त्यांच्या मोठा भाऊ पळून जातो कालांतराने तिघे एकत्र यॆउन लेखकाची कशीबशी शाळा सुरु होते. वडिलांच्या विरोधास न जुमानता लेखकाचा मोठा भाऊ त्यांच्या मागे उभा राहून त्यांना शिक्षण घेण्यास पाठींबा देतो अन हे कथानक संपते.
पूर्ण पुस्तकात /कथेत लेखकाची व त्याच्या कुटुंबाची त्यांच्या वडिलांच्या स्वभावामुळे होणारी विलक्षण ससेहोलपट व विस्कळीत आयुष्य ह्यांचे खरेखुरे रेखाटन आहे क़ुठेहि लेखकाने अतिशयोक्ती केलेली नाहि.पुस्तक वाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी आल्यावाचून रहात नाही. लेखकाच्याच म्हण्याप्रमाणे धाडशी, कष्टाळू ,बेफिकीर ,भन्नाट ,थोडेसे मानसिक विकृतीचे बळी ,बेफाट पण दुर्दैवी असं वडिलांचं पात्र आहे जे पूर्ण कथेवर पसरून राहिल आहे.
अनेक वेळा आपल्याला लेखकांच्या वडिलांचा पराकोटीचा राग येतो ,लगनग्या हनुबद्दल कळवळा येतो आपण त्यांचं आयुष्य समरसून अनुभवतो इतक उत्कट लेखन लेखकाने केलेल आहे. वर्णन करण्यापेक्षा स्वतः वाचण म्हणजे भन्नाट अनुभव आहे.पुस्तक जरूर वाचावे.
रिव्यू :
आपल्या बालवयातल्या अभावग्रस्त आयुष्याचे, वडिलांच्या विक्षिप्त, उग्र स्वभावामुळे, हुकूमशाही वृत्तीमुळे अधिकच खडतर झालेल्या जगण्याचे, स्वत:च्या व कुटुंबियांच्या पराकोटीच्या शोषणाचे कलात्मक तटस्थतेने साधलेले अतिशय संयत व मर्मग्राही चित्रण "बालकांड"मध्ये आढळते.
-- केशवराव कोठावळे पुरस्कार समितीचा अभिप्राय
'बालकांडशी तुलना करता येईल असं एखादं पुस्तक आता जागतिक साहित्यात शोधायला हवं.
-- विनय हर्डीकर