Friday, 1 March 2013

वाटा आडवाटा -- वामन होवाळ (vaata aadvata -vaman hoval)

     
पुस्तकाचे नाव: वाटा आडवाटा        लेखक: वामन होवाळ        रिया पब्लिकेशन         पाने:१४४           किंमत:१४०

ह्या लघुकथा संग्रहात लेखकाच्या दहा कथांचा समावेश आहे.सर्व कथा ८६-८७ सालांमध्ये वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये (कामगार,आकंठ ,व्यासपीठ,रसस्वाद ई )प्रसिद्ध झालेल्या आहेत.प्रथम पुस्तकाचे मुखपृष्ट पाहून कुठल्यातरी भ्रमणकथा असतील असे वाटलेले पण तसे नाहीये.कथा वेगवेगळ्या बाजाच्या ,वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत.
   काही कथा अगदीच साध्या आहेत,काही मात्र छान आहेत .मलातरी पाटीलकी,ढवाळ ,नवी वाट ह्या कथा आवडल्या.वाटा  आडवाटा तर अजिबात आवडली नाही ,कथा जाम  फसलेली आहे.एकूण लेखन /पुस्तक  ठीक आहे पण  बऱ्याच ठिकाणी  लेखनात बौद्ध समाजाचा ,त्यातील लोकांचा उल्लेख , बाबा साहेबांचा उल्लेख आहे, तो खरच अनावश्यक वाटतो काही ठिकाणी ठीक आहे ,संदर्भ म्हणून चपलख बसतो पण त्या गोष्टीची लेखकाने पुनरावृत्ती केलेली आहे बरयाच  ठिकाणी जी कि  नसती तरीही  कथा वेगळी झाली नसती.
प्रशांत पं. मयेकर १मार्च १३_२१.१५

प्रिय जी. ए.--सुनीता देशपांडे (priya G A-sunita deshpande)

 पुस्तकाचे नाव: प्रिय जी. ए.      लेखिका: सुनीता देशपांडे       मौज प्रकाशन     कि:२००      पाने:१८८
               
                       प्रिय जी ए म्हणजे लेखिकेने प्रसिद्ध लेखक जी ए कुलकर्णींशी पत्रलेखनातून केलेला संवाद.थोडक्यात ह्या पुस्तकात लेखिकेने जी ए'ना लिहिलेली पत्रे आहेत.पत्रे फक्त सुनिता  ताईनीच लिहिलेली असल्यामुळे व त्यांना आलेली उत्तरे ह्या पुस्तकात समाविष्ट नसल्यामुळे काहीस अपूरं  राहिल्यासारखं  वाटतं  पण त्यांची लेखनशैली,एकूण विचार,मते,जी एं च्या आदल्या पत्रातील संदर्भ ह्यामुळे तितकाही काही मोठा अडथळा  वाचताना जाणवत नाही.
                साधारण ८५ सालापर्यंत चाललेला हा पत्र सोहळा कालांतराने पुस्तकरूपाने आला.सुनिता ताइंचे  जी ए हे आवडते लेखक ,पु लं बाहेरगावी गेल्यामुळे लेखिकेने त्यांना पत्रोत्तर केले व हि श्रुखला चालूच राहिली.जी ए व लेखिका यामध्ये परिपक्व ,जिव्हाळ्याची ,वैचारिक देवनघेवनिचि ,मत-मतातरांची ,आपुलकीची मैत्री दिसून येते.पुस्तक वाचताना  वाचकासाठी लेखिका केवळ पु ल च्या पत्नी राहत नाहीत तर  स्वतंत्र,प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून समोर येतात.त्यांचे विचार,लिहिण्याची पद्धत ,एकूण विचारसरणी वाचकाला खिळवून ठेवते व त्यांच्याबद्दल मनात आदर निर्माण होतो.
  जी ए म्हणजे कोशात राहिलेले लोकांचे आवडते व्यक्तिमत्व.त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला त्यांचा प्रत्येक वेडा वाचक अगदी उत्सुक असतो. ह्या पत्रांमधून देखील काही प्रमाणात जी ए समजतात.काही बाबतीतील त्यांची मते समजतात.आजकाल पत्र लिहिण  तसं काल बाह्यच झालंय पण हि अतिशय सुरेख पत्रं वाचली कि त्यातील गोडवा जाणवतो.आपण काय चुकवतोय  ते देखील जाणवतं .असो हे थोड विषयांतर झालं पण पुस्तक सुरेख आहे.एकदा तरी  नक्की वाचण्या सारखे.
  दोन प्रगल्भ व्यक्तींमधल्या विचारांची देवाणघेवाण हि सहसा शब्दरूपात अनुभवायला मिळत नाही.पत्रे जुनी असली तरी काळाच्या बंधनात अडकणारी नव्हेत.
--- प्रशांत मयेकर १ मार्च २०१३_ २०.३५

Thursday, 21 February 2013

स्वतःविषयी --अनिल अवचट (swatavishayi-anil avchat)

पुस्तकाचे नाव :  स्वतःविषयी    लेखक:अनिल अवचट      मौज प्रकाशन      प्र आ: १९९०     पाने:१५३       किंमत:१२०रु

                                                                                 
 पुस्तकाचे नाव   स्वतःविषयी असले   तरीही हे आत्मचरित्र नाही .ह्यातील बहुतेक सर्व लेखन पुस्तकरूपाने येण्यापूर्वी   मौज ,सत्यकथा, किर्लोस्कर या दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेलं.लेखकानेच पुस्तकामध्ये सांगितल्या प्रमाणे त्यानंतर काही मित्रांनी आत्मचरित्र लिहितोयस असा  म्हटल्यावर त्यांना तसं वाटेना .आत्मचरित्र असते तर भोवताली व्यक्ती,तत्कालीन महत्वाच्या घटना ,ई सर्व काही दिले असते .घटनाक्रम दिला असता.पण तसा उद्देश नव्हता.माझ्या परीने मी पूर्वायुष्यात बुडी मारून काही अनुभव किंवा दृश्री घेऊन बाहेर येत होतो अस ह्या पुस्तकाच्या बाबतीत त्याचं मत आहे.
       पुस्तक एकूण पाच टप्प्यात लिहिलेय. दहावीचे वर्षं ,डॉक्टरी,मुक्काम नानापेठ,धार्मिक आणि संगोपन.लेखकाची दहावी मधली मजा ,होस्टेल लाइफ ,त्याचं वाहवत जाण हे सगळ दहीवीचे वर्षं मध्ये येतं.डॉक्टरी पण मस्त लिहिलंय.तिथले अनुभव अंगावर काटे  आणतात पण मजाही येते.सगळ्यात मस्त आहे ते संगोपन.लेखकाला दोन मुली.त्यांच्या जन्माच्या आठवणी,त्यांचे संगोपनाचे किस्से,त्याचं मोठ होणं शिकणं त्यात एक वडील म्हनूण  लेखकाचा वाटा  ,त्यात त्यांचे विचार मस्त जुळून आलेयत.एकदा जरुर  वाचावे असे पुस्तक.शेवटचे प्रकरण तर मस्ट च .
लेखकाचे प्रस्तावनेतील पुस्तकावरील मत मला फार आवडले ते असे : लिखाण हि माणसाची निर्मिती ,म्हणून त्याचे ते मुल मानतात.पण मला ते अनुभव शिकवणाऱ्या वृद्ध पित्यासारखे वाटतेय.लिखाण हे माझ्यापेक्षा मोठे ,कारण त्या लिखाणातल्या अनेक व्यक्तींमध्ये वावरणारी,सुख दुखे भोगणारी,चुका करणारी मी हि एक व्यक्ती आहे.माझे डोळे उघडणाऱ्या ह्या लेखनाविषयी कुणाहीविषयी नसेल एवढी कृतज्ञता माझ्या मनात आहे.
          एकूण मला अनिल अवचट आवडत चाललेले आहेत .लवकरात लवकर त्यांची सारी पुस्तके वाचायचा प्रयत्न करणार .

प्रशांत पं मयेकर ,२१/२/१३ ,२१.३०

Monday, 18 February 2013

काजळमाया-जी ए कुलकर्णी (kajalmaya-g a kulkarni)

पुस्तकाचे नाव: काजळमाया     लेखक: जी ए कुलकर्णी           पॉप्युलर प्रकाशन    पाने: २७८ 


    जी ऐचं नाव ऐकून,त्यांच्याबद्दल एवढ सगळ वाचून मी त्यांची पुस्तक वाचायला बराच उत्सुक  होतो.दोन तीन वाचली पण मनात भरली नाहीत एकतर ते अनुवाद होते किवा फार डोक्यावरून जाणारी वाटली.पण काजळमाया वाचल्यानंतर समजले,पटले  कि जी ए काय चीज आहे ते.
             ह्या लघुकथा संग्रहाला १९७३ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.पुस्तकात एकूण १४ लघु कथा (साधारण २०-२५ पानाच्या)आहेत. जबरदस्त लेखन.उत्कृष्ट लेखनशैली,वाचताना माणूस spellbound होऊन जातो.कित्येक वेळा तर वाक्यावर थांबून आपण विचार करतो,दोन तीन चार वेळा ते वाक्य वाचतो ,समरसून जातो ह्यातच लेखकाचे यश आहे त्यांची विद्वत्ता दिसून येते.
   साऱ्या कथा मानवी जीवनाच्या दुखाशी संबंधित.किती वेगवेगळ्या प्रकारची माणसं किती वेगवेगळे त्यांचे आयुष्य व त्या सगळ्यावर त्यांची दुःखं .प्रत्ये कथेला निश्चित असा शेवट नाही.त्या पात्राशी निगडीत होत असताना आपण त्याच्या दुखात सहभागी होत असतानाच कथा संपतात आपल्याला त्याच कथानाकाभोवती भिरभिरत ठेवत .कितीही नाही आवडला तरी हा लेखनप्रकार मात्र जबरी आहे लेखकाने समर्थपणे मांडलाय.विदुषक,भोवरा,गुलाम अशा कित्येक कथा छान आहेत.प्रत्येक कथा म्हणजे वेगळ विश्व. कसं  सुचत एवढ हाच विचार मनात येतो.मराठी साहित्यातील चांगले लेखन वाचताना ह्या पुस्तकाचा जरूर विचार व्हावा.

Friday, 15 February 2013

चकवाचांदण एक वनोपनिषद -मारुती चितमपल्ली (chakwachandan-maruti chitampalli)

पुस्तकाचे नाव: चकवाचांदण एक वनोपनिषद       लेखक: मारुती चितमपल्ली      पाने:६८७        किंमत:५०० रु     मौज प्रकाशन     प्र आवृत्ती:२००५
                            

            जेव्हापासून मारुती चितमपल्लींची   नवेगावबंध चे दिवस व ranvata हि पुस्तक वाचली तेव्हापासून
 त्याचं आत्मचरित्र असलेल पुस्तक वाचण्यासाठी मी फार उत्सुक होतो .कुठेही मिळालं नाही तेव्हा सरळ विकतच घेतलं .तब्बल पावणे सातशे पानांचं हे पुस्तक म्हणजे एक अजब अनुभव आहे.लेखकांनी त्यांचा बालपणापासून ते सेवा निवृत्त होईपर्यंतचा कालखंड ह्यात लिहिला आहे.सुरुवातीचा काही भाग जेथे त्यांच्या कुटुंबाची ओळख आहे ,काहीसा कंटाळवाणा व अनावश्यक झालाय.मग एकदा का त्यांच करियर सुरु झाल कि मग सर्व भाग अचाट अनुभवांनी भरून गेलाय.वाचताना अपूर्व आनंद होतो.आज त्यांनी जे अनुभवलं ते सर्वसामान्य माणुस नाही अनुभवू शकत त्यामुळेच वाचताना त्यांचा हेवा वाटतो.बरीच नवीन माहिती मिळते,पक्ष्यांकडे झाडाकडे ,जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळते.
                नोकरीच्या कालखंडात लेखकाची अनेक वेळा बदली झाली त्यामुळे  पुणे,तामिळनाडू,म्हैसूर,पोंडेचरी ,महाबळेश्वर ,मावळ,पनवेल,नागपूर,नागझिरा ई ठिकाणच्या जंगलांचे ,निसर्गाचे प्राणी जगताचे अनुभव वाचायला मिळतात.कित्येक पक्ष्यांची नवे कळतात त्यांच्याविषयी माहिती मिळते .पुस्तकाच्या शेवटी साहित्यीकान्च्या सहवासात ह्या
ह्या सदरचे लेखन आहे त्यात लेखकाने त्याना  लाभलेल्या   अनेक साहित्यिकांचे सहवासाचे अनुभव लिहिलेयत.त्यात बाबा आमटे,गो नि दा,गंगाधर गाडगीळ ,व्यंकटेश माडगुळकर ,जी ए  इ बद्दल लेख आहेत.
      पुस्तक वाचनात आपल्याला निरनिराळी माणसे भेटत जातात जी आज हयात नाहीत पण त्यांचा चांगुलपणा,माणुसकी,श्रेष्टत्व,जाणतेपणा,अनुभव आपल्याला अंतर्मुख करतो.पावनीचे माधवराव पाटील,चित्रकार आलमेलकर ,टागसु  महाजन हे त्यापैकीच एक.

एकूण पुस्तक जरूर वाचावे असे.मला फार आवडले .पुस्तकातील काही आवडलेली वाक्ये व माहिती:

कळक बांबूला तीस ते साठ वर्षांनी फुलोरा येतो ,त्यानंतर ती बेटं मृत होतात.

प्रत्येक पक्व चंदनाच्या झाडाचा गाभा सुगंधी असेलच अस नव्हे .त्याला अपवादही असतात .अशा वेळी खोडात गिरमिट  घालून गाभ्यातील नमुना काढण्यात येतो.त्यावरून सुगंधी गाभ्याची खात्री होते

हत्ती हा अहोरात्र चरणारा प्राणी आहे.मधूनच काही वेळ जमिनीवर आपलं प्रचंड अंग टाकून तो आडवा होतो.हत्ती झोपला कि त्याच्या घोरण्याचा आवाज दूरपर्यंत ऐकु येतो.

डून म्हणजे रुंद आणि सपाट असं खोरं

जिम कॉर्बेट यांची पुस्तके :  man eaters of kumau / man eating leopard of rudraprayag, /My india 1952 / jungle lore 1953/ The temple tiger1954

जिकडेतिकडे भाताची खापर दिसत.वाटे कि समोर हिरवा समुद्र पसरला आहे.हवेत डोलणाऱ्या भाताच्या पिकावरून वारयाच्या झुळकेबरोबर हळुवार लाटा उठत.

मरण कुणाच्या ताब्यात आहे?पण जराजर्जर होऊन अंथरुणावरचं मरण मला आवडणार नाही.अंतरीची इच्छा आहे ,मृत्यु यावा तर अशा सह्याद्रीच्या कुशीत -गो नि दांडेकर -चकवाचांदण

 आर्थर कोअंस्लर ने एका ठिकाणी लिहिलंय हे जग दुष्ट लोकांनी भरलेलं असलं तरी थोडी माणस चांगली असतात.जग अश्या बोटावर मोजता येणाऱ्या चांगल्या माणसांवर चालतं.





     

Monday, 11 February 2013

संशयाचे जाळे --चिं वि जोशी (sanshyache jale-chi vi joshi)

पुस्तकाचे नाव: संशयाचे जाळे                  लेखक: चिं वि जोशी     
कोण्टिनेण्टल प्रकाशन                किंमत:४०रु              द्वि आ : १९४९   पाने:११७     प्रकार:कादंबरीका

      लेखकाची हि ऐतिहासिक रहस्यमय कादंबरी. छोटी असली तरीही मस्त,उत्कंठा वर्धक .विजापुर् शाहीच्या काळातील गोपाळगड नामक गडावर घडलेली हि घटना.किल्लेदाराचा मुलगा व त्याच्यासारखाच दिसणारा त्याचा तोतया.मग एका युद्धात त्याचे गायब होणे व नंतर अचानक बर्याच वर्षांनी प्रकट होणे त्यातून निर्माण होणारा पेचप्रसंग,न्यायनिवाडा लेखकाने मस्त रंगवला आहे.इतिहासकालीन पार्श्व भूमी देखील चांगली रंगवली आहे.छोटेखानी असून पुस्तक मस्त.

Saturday, 26 January 2013

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती -बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन-- डॉ ह वि सरदेसाई

पुस्तकाचे नाव: घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती -बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन      लेखक:डॉ ह वि सरदेसाई
उत्कर्ष प्रकाशन    १७ वे पुनामुद्रण :२०१२   किंमत-१०० रु   पाने:१६०
   
                         माझ्या एका मित्राने मला आवर्जून हे पुस्तक वाचायला सांगितलेल.नावाप्रमाणेच हे पुस्तक बाल संगोपनावर मार्गदर्शन करता.लेखकाने खूप चांगल्या भाषेत मुलांना कस समजावून घ्याव ते कसे संस्कार करावे त्यासाठी आई वडिलांचा काय व्यवहार असावा कोणता stand असावा ,त्यांनी स्वत कसे वागावे जेणेकरून मुलामध्ये चांगले बीज पेरले जाईल हे सांगितलय.
  खुद्द प्रकाशकांनी प्रस्तावनेत लिहिलंय कि मुलांना समर्थपणे वाढवायची पूर्वतयारी करायची म्हणजे स्वतःच थोड नव्याने मोठं व्हायचं.आजवर ऐकून असलेली किंवा ऐकलेली  नसलेलीही माहिती करून घ्यायची.मुलाच्या शरीराची,मेंदूची,बुद्धीची वाढ केव्हा कशी होते आणि या वाढीला पालकाला कसकसा हातभार लावता येतो हे समजून घ्यायंच."समजावून देण्याच्या " याच भूमिकेतून डॉ सरदेसाई यांनी परिश्रमपूर्वक हे पुस्तक लिहील आहे.उदाहरणांनी विषय सोपा आणि समजेल असा स्पष्ट केला आहे.
        एकूण पुस्तक छान आहे.अगदी काही भाग अनावश्यक वाटत असला तरी जरूर वाचावे व आचरणात आणावे.
पुस्तकातील काही  वाक्य:
माणसापुढे दोन मार्ग आहेत.एक मार्ग प्रेयसकडे नेणारा म्हणजे तत्काळ सुख देणारा आहे तर दुसरा मार्ग श्रेयस कडे नेणारा म्हणजे हिताचा.जी व्यक्ती श्रेयसचा मार्ग निवडते ती सुबुद्ध असते
शास्त्र सांगते कि नकाराचा सारखा वापर करून तसं फारसं काही साध्ण्यासारख नसत.नकारापेक्षा त्या नकारच रुपांतर जर होकारात करता आलं ,म्हणजे एकाएकी दुसर काही बदली देता  आलं ,पर्यायी आनंदाचा शोध लावून देता  आला तर गोष्टी खूप सोप्या आणि सरळ घडवता येतात.
अपयश आलं तरी नाउमेद न होता पुन्हा उभारी धरावी लागते ,फुकटात घरबसल्या काही मिळत नाही या विचाराचे बाळकडू बालपणातच मिळण    इष्ट असतं .