Tuesday 26 May 2020

झोंबी - आनंद यादव (zombi)

पुस्तकाचे नाव- झोंबी
लेखक- आनंद यादव
किंमत-३२०₹, पृष्ठसंख्या-३७९
प्रथम आवृत्ती-डिसेंबर १९८७


   झोंबी म्हणजे लेखक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग.बालपण व सुरुवातीच्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आयुष्याशी केलेली ,झोंबा झोंबी म्हणजे हे पुस्तक.त्यांचे एकूण आत्मचरित्र ४ भागांमध्ये आहे.पुढील पुस्तके नांगरणी,घरभिंती आणि काचवेल ही होत.
     पुस्तकाला पु लं ची१६ पानांची प्रस्तावना लाभली आहे.त्यांनी लिहिलेली ही प्रस्तावना वाचली की ह्या पुस्तकाला अजून कुठल्याही समीक्षानाची,अभिप्रायची गरज नाही असे वाटते.अतिशय उत्तम भाषेत पुस्तकाचा लेखाजोखा त्या १६ पानाच्या अर्कात आहे.
    प्रचंड पराकोटीची गरिबी,अशिक्षितपणा,शिक्षणाविषयी पालकांची उदासीनता,पोटापाण्यासाठी करावे लागणारे काबाड कष्ट,जेवायलाही मिळेल ना मिळेल ही परिस्तिथी  हया सर्वातून लढत झगडत कुठलाही पाठिंबा नसताना,आजूबाजूला फक्त नकारात्मकता दिसत असताना लेखक केवळ शिक्षणाच्या उर्मीने व इच्छेने जगत जातो व काबाड कष्ट करून अतंर्गत बुद्धिमत्ता व कष्ट ह्या जोरावर शिक्षण कसे पुरे करतो हे वाचनीय झाले आहे.
   ही कादंबरी मराठी साहित्यातील अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली,वाचकांचा ग्रामीण जीवनाविषयीचा दृष्टिकोनच बदलून टाकणारी ठरली.सर्वच स्तरावरून तिचं कौतुक झालं.महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार व भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कारवा इतर अनेक पुरस्कार ह्या पुस्तकाला मिळालेत.
     पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही केवळ जिद्द आणि चिकटीच्या जोरावर आपले ध्येय साध्य करता येते हीच शिकवण ह्या कादंबरीतून मिळते.कादंबरीतील पराकोटीच्या गरिबीचे व इतर प्रसंगाचे वर्णन कित्येकदा अंगावर येते.उत्कृष्ट म्हणून नावाजलेली ही कादंबरी नक्कीच वाचनीय...
                                          २६/५/२०२०
   

Sunday 14 July 2019

शितू - गोपाल नीलकंठ दांडेकर

पुस्तकाचे नाव- शितू
मृण्मयी प्रकाशन(१२व्या आवृत्तीपर्यंत मौज प्रकाशन)
पाने-१६८ किंमत-१७५







       गोनीदांच्या ह्या कादंबरीबद्दल बरंच ऐकून होतो.शितू ही त्यांची मानसकण्या असं ते म्हणत.गोनिदाना भरपूर प्रसिद्धी व प्रेम मिळवून दिलेली ही कादंबरी.
       कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात घडणारी ही कथा तसं म्हणायला गेलं तर ना व्यक्तिचित्रण आहे ना प्रेमकहाणी .प्रथम आवृत्ती १९५३ सालची आहे.त्या वेळच्या रूढी, परंपरा,राहणी,जीवनमान यांचं चित्रण कादंबरीत येतं. अजाणत्या वयात बालविधवा झालेली,पांढऱ्या पायांची,घोखाई,हडळ म्हणून हेटाळली गेलेली,बापाचा निवारा लवकर गेलेली एक लहान निर्वाज्य पोर ते अप्पांच्या पंखाखाली मोठी झालेली समजूतदार,सोशिक,सुंदर शितू हा प्रवास लेखकांनी मस्त मांडलाय.कोकणातील बारीकसारीक वर्णनं आपल्याला थेट तिथे घेऊन जातात.
       शितू व अप्पांच्या मुलगा विसू यांचं भावविश्व अव्यक्त प्रेमभावना,समाज चालीरीतीमुळे आलेली बंधनं, शीतूची असहायता व घुसमट व त्यांचा शेवट गोनिदानी मस्त रेखाटलाय.वाचकांना शितू आपलीच वाटायला लागते.एक उदासीनपणा,पोकळी भरून राहते मनात.
      रावीमुकुलांचं मुखपृष्ठ खासच.दीनानाथ दलालांची पुस्तकामधली रेखाटन लाजवाब.गोनीदांच्या वाचकांनी गोनीदांच्या हृदयाच्या जवळ असलेलं हे प्रेमकाव्य एकदा जरूर वाचावं.आताच्या काळात जुने संदर्भ,चालीरीती आपल्याला पचनी पडायला कठीण जातील कदाचित पण शितू मनात घर करून राहिली नाही असं म्हणणारा विरळाच.....

       १४/७/१९
पुस्तक अभिप्रायमधली मते वैयक्तिक आहेत ...

Tuesday 19 March 2019

आप्त -अनिल अवचट (APTA -Anil Avchat)

पुस्तकाचे नाव: आप्त -अनिल अवचट 
प्रथम आवृत्ती: १मे १९९७ 
मौज प्रकाशन ,किंमत:१६०
पृष्ठसंख्या:१६४






                 अवचटांनी वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये पूर्व प्रसिद्धीस आलेल्या व्यक्तिचित्रांच्या लेखांचे संकलन म्हणजे "आप्त" हे पुस्तक होय. एकूण आठ व्यक्ती वर्णनं आहेत ह्या पुस्तकात. सगळी खासंच . प्रवाही भाषेत लिहीलंय. कुठलीही अलंकारिक,अवजड भाषा नाही. प्रत्येक व्यक्तीबद्दल वाचून झाल्यावर अरेरे आपण का नाही ह्या व्यक्तीला भेटलो असं वाटत राहतं,आणि अश्या वेगवेगळ्या व्यक्ती आपल्या आयुष्यात असत्या तर काय बहार होती असाही वाटतं . 
      तीन व्यावसायिक,मिनिता सांतिझो ,जेपी ,मारुतराव सरोदे ,विनायकराव,पाटीलसाहेब दोन गुरु,क्लासो  अशी एकाहून एक सर्रास माणसं  आपल्याला ह्या पुस्तकरूपाने भेटतात व अवचट आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. 
      घाटग्यांचा चिवडेवाला,अमेरिकेतली मिनिता ,जेपी,अवली वैज्ञानिक सरोदे अफाट वाचन व ज्ञान असलेले विनायकराव ,पाटील नावाचे कर्तव्यनिष्ठ व जबरदस्त पोलीस ,आगाशांसारखा हौशी व निष्ठेचा योग्य शिक्षक व शेवटी अवली वल्ली क्लासो ह्या सगळ्यांनी हे पुस्तक वाचनीय केलंय . 
        व्यक्तिचित्रांची आवड असलेल्यांची चुकवू नये असं पुस्तक. 

                                                          प्रशांत मयेकर 

वाचत सुटलो त्याची गोष्ट -निरंजन घाटे

 पुस्तकाचे नाव :वाचत सुटलो त्याची गोष्ट -निरंजन घाटे 
प्र आवृत्ती-२३/४/२०१७ 
समकालीन  प्रकाशन ,किंमत :३०० रु 
पृष्ठसंख्या : २४५
                          




               हि आहे एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर . वाचनालयात जेव्हा हे पुस्तक चालून पाहिलं तेव्हा लेखकाने पानापानांवर अनेक पुस्तकांचे संदर्भ दिलेले आढळले ,त्यामुळे वाचायला घरी आणलं. 
               जगातल्या तमाम वाचनवेड्याना समर्पित असं लिहिलंय लेखकांनी.  माणूस अक्षरशः पुस्तक जगला असं म्हणावं इतपत प्रचंड वाचन त्यांनी केलंय . कुठलाही विषय व्यर्ज ना ठेवता! प्रामुख्याने इंग्रजी वाचन जास्तच. आज जवळपास १८० पुस्तकांचं लेखन केलेल्या घाटेंनी त्यांचा वाचनवृत्तान्त वाचकांसमोर मांडलाय. 
               रहस्यकथा,साहसकथा,टॅबू विषयावरची पुस्तके ,साहित्य,परमानसशास्त्र ,विज्ञानकथा व त्यासंबंधी वाचन ,महिलांसंबंधीची पुस्तकं ,शब्दकोशांचे वाचन ,चरित्र -आत्मचरित्र ,इतर कुठल्याही विषयावरचे पुस्तक असं प्रचंड वेगवेगळ्या विषयांवरचे वाचन,पुस्तके,लेखक ह्यांबद्दलची माहिती पुस्तकात येत राहते. 
                 ह्याचबरोबर पुस्तक मिळवण्यासाठी केलेली धडपड ,त्याच्या आठवणी व संदर्भ पण आपसूकच येतात . पुस्तक वाचल्यावर हौशी वाचकांना किंवा ज्यांचं वाचन अगदी नावाला आहे त्यांना आपण किती खुजे आहोत या माणसाच्या वाचनानुभवापुढे असं वाटल्याशिवाय राहत नाही..अमेरिका ,इंग्लंड व इतर पाश्चात्य देशातील शेकडो नामांकित तसेच ओळख नसलेल्या देखील लेखकांची पुस्तके लेखकाने वाचलीयेत व त्यांचे संदर्भ पुस्तकात दिलेले आहेत. वाचनाची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे. 

प्रशांत मयेकर 
९९२०९१२६९८

Wednesday 30 March 2016

नवीन परीक्षण लवकरच

काही कारणांमुळे हा धागा बरेच दिवस काही नवीन लिखानाशिवायाच होता...तरी लवकरच नवीन पुस्तक परीक्षणं लिहायला चालू करेन…. 
   धन्यवाद 
प्रशांत पं  मयेकर 

Monday 11 November 2013

चक्र-जयवंत दळवी (chakra -jaywant dalavi)

पुस्तकाचे नाव: चक्र
लेखक: जयवंत दळवी
म्याजेस्टिक प्रकाशन  पाने :१६७  किंमत १०० रु



  चक्र बद्दल बरच काही ऐकून होतो व शेवटी एकदाची कादंबरी हातात पडली. जयवंत दळवींची हि पहिलीच कादंबरी पण एक लेखक म्हणून ते किती भन्नाट लिहू शकतात ह्याची पुरेपूर साक्ष देणारी .
       कादंबरीचं background म्हणजे मुंबईतील एक झोपडपट्टी. पुस्तक सत्तर च्या दशकांत पूर्वार्धाला लिहिल गेलं  असल तरी अजूनही ते तितकंच वाचनीय आहे . झोपडपट्टीतील गरीब कुटुंब,त्यांची भाषा ,विचारसरणी,जगण्यासाठी करावा लागणारा आटापिटा ,बकाल पणाचे वास्तविक दर्शन अंगावर काटा आणते. आपल्यासारखा मध्यमवर्गीय पांढरपेशा माणूस अक्षरशः व्यतिथ होतो. कादंबरीत बकाल झोपडपट्टीत राहणाऱ्या बेन्वा ,त्याची आई,त्याचे मित्र ,तिथला तडीपार झालेला गुंड लुका ह्याच्या बरोबर कादंबरी पुढे जात राहते. त्याचे जीवनमान,आत्यंतिक गरिबीमुळे आलेलं अगतिक जीवन,एक वेळच्या भाकरीची भ्रांत असलेल्या रिकामटेकड्या माणसांची जगण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड त्यांनी झोपडपट्टी वासियांच्याच भाषेत समर्थपणे उभी केली आहे .
           पराकोटीच्या गरिबीमुळे माणूस कुठल्या थराला जाऊन वागतो,त्यामुळे त्याच्या सुंदर स्वप्नांची धूळधाण  कशी होते व  नियतीचे हे दुष्ट चक्र कसे चालू राहते हेच पुस्तकात अक्षरश जिवंत केलय व पुस्तकाचं नाव सार्थ केलय. पुस्तकात शिवराळ भाषा शिवराळ न वाटता वास्तववादाकडे झुकते त्यामुळे ते आक्षेपार्ह नाही वाटत .एकुन एकदा वाचण्यासाठी पुस्तक छान आहे. पण एकदमच मस्ट रीड असं मात्र नाही .

Tuesday 10 September 2013

vaanprashtha-ganesh devi

पुस्तकाचे नाव : वानप्रस्थ
लेखक:गणेश देवी
पद गंधा प्रकाशन ,पाने १९९
पुस्तकाच नाव वाचून वानप्रस्थाश्रमा विषयी  असे वाटून मी पुस्तक वाचायला घेतले.सुरुवात फारच शाब्दिक आहे म्हणजे वाचायला जड ,विवेचन पर लेख आहे नंतर मात्र काही काळ पुस्तक वेग पकडते.      
गणेश देवी स्वतः नावाजलेले लेखक तर आहेतच त्याशिवाय विचारवंत व समाजसेवक म्हणूनही त्यांच कार्य प्रचंड आहे. आदिवासींसाठी गुजरातेतील तेज् गड येथे संस्था उभारून त्या समाजासाठी मौलिक कार्य कार्य्ण्यात त्यांचा सिंहाचा वाट आहे. पुस्तकातील पुढील कथा त्यांचा साहित्य प्रसार केंद्रासाठी लढा,त्यातील घडामोडी ,चढ उतार यांनी भरलेल्या आहेत नंतर किक्यारीया ह्या कथेत गुजरातेतील धार्मिक दंगलीच्या वास्तवावर व त्या पार्श्व भूमीवर आदिवासिच्न्हा सहभाग ह्यावर अत्यंत तठ्स्थ व तार्किक मते मंडळी आहेत(काही अंशी जी मला अजिबात पटली नाहीत ,त्यांचा सूर BJP ,VSP ,बजरंग दल विरोधातच आहे).बकि कथा वानप्र स्था विषयी,जंगलांविषयी अशी सरमिसळ अहे. एकूण पुस्तक वाचण्याजोग असलं तरी मस्ट रीड असा काही नाहीये पण काही बाबतीत नवीन माहिती व विचारदृष्टी नक्कीच देऊन जातं.
   ह्या पुस्तकाला सहा अवार्ड्स मिळालेले आहेत त्यापैकी दुर्गा भागवत मेमोरिअल अवार्ड व महाराष्ट्र फौंडेशन अवार्ड हे देखील आहेत .एकुन पुस्तकात आदिवासींची हलाखीची परिस्थती ,त्यांच जीवनमान ,त्यांच्यापुढील संघर्ष ह्यांची जाणीव वाचकाला नक्कीच होते.