Friday 30 November 2012

रानवाटा --मारुती चितमपल्ली (ranvata--maruti chitampalli)

पुस्तकाचे नाव:रानवाटा    लेखक: मारुती चितमपल्ली
साहित्य प्रसार केंद्र नागपूर   प्रा आवृत्ती:१९९१   किमत:१००   पाने:१४९

निसर्गाविषयी ललित लेखनाचे हे पुस्तक. पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी  महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्वाच्या पदावर कार्य केलेय .वन्यजीव व्यवस्थापन ,वने,वन्य प्राणी व पक्शिजागाताविषयी उल्लेखनीय संशोधन त्यांनी केलेले आहे.
         ह्या पुस्तकामधील बरेच लेख जुन्या दिवाळी मासिकांमध्ये छापले गेलेले आहेत(१९८५,८४,७७ ई सालात ).पुस्तकामधील सगळेच लेखन अप्रतिम व वाचनीय.निसर्गवेड्या माणसाला /वाचकांना अजून काय हवे.जे जे आपण प्रत्यक्ष जंगलात जाऊन अनुभवू शकणार नाही किंवा सामान्य माणसाला अनुभवता येणार नाही असे त्यांना आलेले अनुभव त्यांनी कथन केलेले आहेत.तनमोराचे दिवस,धन्चीडी,रानातली घरं,पाडस,इटीया  डोहातील हुदाळे,शाल्मली,पक्षी निरीक्षण ,पांगारा,वन्यजीव निरीक्षणाची  किमया व अरण्य वाचन असे एकाहून एक सरस लेख ह्या पुस्तकात आहेत.कदाचित नावावरून  काही जणांना काहीच कळणार नाही पण वाचताना हे सगळे अनुभव आपल्याला थेट जंगलात घेऊन जातात.जंगलाच्या जादुई दुनियेची ओळख करून देतात.तशी त्यांची सगळीच पुस्तके मस्ट रीड आहेत.
    ह्या पुस्तकाला ९१-९२ सालचा उत्कृष्ट साहित्यानिर्मितीचा राज्य पुरस्कार,भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार,मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत.१९९३ साली या पुस्तकाची आकाशवाणी पुणे केंद्रावर वाचण्यासाठी निवड झाली होती तसेच पाठ्यपुस्तकात देखील यातील अरणी कथा होती.
ह्या पुस्तकातील एक कथा अरण्यवाचन मला नेटवर स्कॅन केलेली सापडली तिची लिंक :
http://www.astro.caltech.edu/~vam/mchitam/

सावर रे -भाग ४ --प्रवीण दवणे (savar re -4 pravin davne)

पुस्तकाचे नाव:सावर रे -भाग ४                        लेखक:प्रवीण दवणे
नवचैतन्य प्रकाशन                  पाने:१४४                किंमत:११०                  प्र आवृत्ती :मार्च २००३
      
आज सावर रे च्या सिरीज मधला ४थ  पुस्तक वाचून झालं.एकदम छान  पुस्तक. आयुष्यात अनेक घटना घडतात.चांगल्या- वाईट ,संवेदनशील मन त्यांचा आपापल्या परीने अर्थ लावत.पण दवनेनी अतिशय उत्कृष्ट शब्दात प्रत्येक प्रसंगाच किंबहुना परीस्तीथीच वर्णन केलय.
              वि वा शिरवाडकरांच्या पुस्तकामधील दिलेल्या अभिप्रायानुसार:"अतिशय तरल अशी संवेदना ,लालित्यपूर्ण शैली आणि जीवनाच्या मुलभूत मुल्यांवरील अभेद्य निष्ठा यांचा सुंदर संगम त्यांच्या काव्यात्म लेखनात झालेला आहे.अशा वृत्तीचे लेखकच साहित्यात मोलाची भर घालू शकतात".
   आयुष्याच्या अनेक वळणांवर मुलांना शिकवण देण्यासाठी अनेक आई बाप जीवाचे रान करीत असतात अशासाठी हे पुस्तक किवा सगळीच सावर रे  पुस्तके वरदान आहेत.ती एक वेगळीच दृष्टी वाचकांना देतात .डोळ्यात अंजन घालतात ,कसे वागावे शिकवतात ,कसे वागू नये हे शिकवतात.शब्दात वर्णन करू शकत नाही इतके सहजसुंदर लेखन.प्रत्येकाच्या संग्रही असावीत अशी पुस्तके विशेषकरून भाग १ व २ .
पुस्तकातील काही वाक्ये/विचार :
आर्थिक गरजा हि न संपणारी चिरंतन गोष्ट आहे,त्या ओझ्याखाली स्वप्नांची फुलपाखर हुरहुरत राहतात-प्रवीण दवणे, सावर रे -४
नाविन्य संपला कि कामाला शिळेपणाचा गंध येऊ लागतो .तो शिळेपणा चेहऱ्यावर उतरतोच:पण आपले दृष्टीकोनही शी'ळे उतरलेले उदास होऊ लागतात.इतके कि दुसर्याचा निर्भर आनंद हेच आपला दुख होतं.
लपवलेले अनेक दुर्गुण प्रवासाच्या दीर्घ काळात ,पलंगातून हलकेच ढेकुण बाहेर यावेत ,तसे लपतछपत बाहेर येतात आणि भोवतीच्याना चावत राहतात .
सगळीच सुख कॅमेऱ्यात टिपता येत नाहीत ,ती अनंत-अपार असतात

Thursday 29 November 2012

बाकी शिल्लक --जयवंत दळवी ( baki shillak--jaywant dalavi)

पुस्तकाचे नाव :बाकी शिल्लक ---जयवंत दळवी     नवचैत्यन्य  प्रकाशन

 प्र आवृत्ती :ऑगस्ट २००५      पाने:२३२   किमत:२००

                          पुस्तकामध्ये दिलेला संदर्भ:  जयवंत दळवींच्या  साहित्याबद्दल,त्यांच्याबद्दल कुतूहल वाढवणारं त्यांच लेखन कुठेकुठे विखुरलेल आहे .जे आजतागायत संग्रहित झालेल नाही .अस काही महत्वाच लेखन प्रथमच ह्या "बाकी शिल्लक"संग्रहात प्रकाशित होत आहे.दळवी म्हणत असत कि मी मनातल बोलत नाही कुणाकडे  आणि डायरीसुधां  लिहित नाही.मला वाटत कि माझे जे काही बरे वाईट गुण ते सारे माझ्या साहित्यात आले आहेत.मानसिक कोंडमाऱ्याचा  निचरा साहित्यातच अधिक होतो व म्हणूनच ज्याला मी खरा कसा आहे याचं कुतूहल आहे त्याला मी माझ्या साहित्यात अधिक सापडेन.
            पुस्तकामधील वाग्मयचौर्य  त्या दोघी एक दत्तू आणि त्याची तीन रूपे पुरुष ह्या कथा चांगल्या आहेत .काही लेख फार जुन्या संदर्भामुळे काळात नाहीत किंवा कंटाळवाणे वाटतात (माझे वैयक्तिक मत ).एकूण पुस्तक ठीकठाक .

Tuesday 27 November 2012

रारंग ढांग--प्रभाकर पेंढारकर (rarangdhang-prabhakar pendarkar)

पुस्तकाचे नाव :रारंग ढांग        लेखक: प्रभाकर पेंढारकर        

मौज प्रकाशन        किमत:१२०   पाने:१७५


Buy Rarang Dhang
           पुस्तकाच नाव विचित्र वाटल्यामुळे मी हे पुस्तक मागवलं. १९८१ मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीच्या १५ आवृत्त्या झाल्यायत.कथेचा नायक प्रभाकर म्हणजे खुद्द लेखक चांगली  मोठ्या हुद्द्याची नोकरी सोडून आर्मी लेफ्टनंट म्हणून हिमालयामध्ये येतो.तेथे रस्ता बांधण्यासाठी त्यांची नेमणूक होते.पुढे आर्मी ऑफिसर व लेखक(सिविलिअन) यांच्या मधील संघर्ष,निसर्गाचे(हिमालयातील ल्यांड स्लाईड ,नदी, अनिश्चित वातावरण) प्रेमळ व रौद्र रूप ,मानवी स्वभावाचे दर्शन  पेंढारकरांनी मस्त मांडलय.मेजर बंब ,मिनू खंबाटा इ पात्रे लक्षात राहतात.प्रभाकरला  निसर्गाविषयी वाटणारे प्रेम,त्याची कल्पकता,हुशारी,धीटपणा,हट्टीपणा व ह्या सगळ्याचा रस्ता बांधताना उलगडत गेलेला प्रवास ह्यामुळे पुस्तक एक अविस्मरणीय अनुभव देउन जाते.( प्रभाकर पेंढारकर हे भालजी पेंढारकराचे मुलगे ).काही वर्षांपूर्वी ह्या पुस्तकाची  ऑडीओ सी डी  देखील प्रकशित करण्यात आली होती.

रानभुली--गो नी दांडेकर (ranbhuli--go ni dandekar)

पुस्तकाचे नाव  : रानभुली
रानभुली लेखक: गो नी दांडेकर
मृन्मयी प्रकाशन           पाने :१०२                                
           
गो नी दा  च्या मानस कन्येची हि कहाणी .गो नि दा रायगडावर कित्येक वेळा राहिलेयत ,कित्येक वेळा गेलेयत त्याला मोजदादच नाही.ह्या किल्ल्यावर  त्यांच विशेष प्रेम. रानभूलीची कहाणी ह्या गडावरच घडलेली .हि अशा एका मुलीची कहाणी आहे जी किल्ल्यावर राहत असते  किल्ला म्हणजे तिच सर्वस्व .त्याखेरीज तिने काहीच जग पाहिलेल नसत. अतीशय निर्भीड,स्वभावाने गोड ,निरागस अशी.रायगडचे वेड  इतकं  कि लग्नानंतर पण नवरयाच घर  सोडून पुन्हा किल्ल्यावरच!!! .कुणी किती समजावले तरी तीच कथा.मग तिचा नवरा तिला मुंबईला घेऊन येतो नंतर ह्या रायगडवेडीचं   काय होत  त्याची हि कहाणी.अतिशय छान  पुस्तक . जबरदस्त लेखन .रानभुली हुरहूर लावते.पुस्तक वाचतानाच तिला भेटावेसे वाटते.

पार्टनर--व पु काळे ( partner --va pu kale)

 पुस्तकाचे नाव : पार्टनर                           लेखक --व पु काळे
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाउस         पाने:१५६        किमत :१२०           प्रथम आ.:१९७६
 
                   व पुचं मास्टरपीस म्हणून ओळखल जाणारं पुस्तक.आज परत  दुसऱ्यांदा  वाचलं.श्री पार्टनर ह्या नावाने ह्याच वर्षी ह्या पुस्तकावर आधारित मराठी सिनेमा देखील प्रदर्शित झालाय.मध्यमवर्गीय श्री ,त्याचा मित्र पार्टनर व श्रीची पत्नी किरण हि मध्यवती पत्र व त्यांची कथा.साधारण मध्यमवर्गीय  माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना व पु नि छान रंगवल्या आहेत .पार्टनर व श्री चे सवांद अप्रतिम .शेवट अंगावर येतो .पुस्तक एकूणच अप्रतिम.व पुं चे  वपुर्झा ज्यांनी वाचले  तर त्यासारखी वाक्ये प्रत्येक पानावर येतात.अशी अप्रतिम वाक्ये लिहिणारा व पुं  शिवाय माझ्या तरी पाहण्यात नाही .काही वाक्ये इथे देत आहे
>माणसाची नजर ज्या वस्तूकडे असते ,तीच वस्तू त्याला पहायची आहे ,तसं त्या माणसाकडे पाहणाऱ्या इतरांना वाटतं
>अंधारात भिंती दिसत नाहीत ,आखून बांधलेल्या खोल्या अमर्याद आकार धारण करतात ,त्यात हरवून जायला सोप जातं .
>कायम आजारी असलेल्या माणसाला जेव्हा ईतर कंटाळतात तेव्हा  त्याचा तो किती कंटाळलेला असतो हे इतरांच्या लक्षातही येत नाही .माणसाच स्वताच्याच कंटाळ्यावर प्रेम असतं.
>रागवून फायदा नाही म्हणून रागवत नाही मी ,पण पुन्हा असले कोते (?) आरोप करू नकोस.माझ्या स्वभावातला एखादा धागा नसेल तुला समजलेला .समजावा अशी अपेक्षा नाही.एखाद्या कृतीमागचा आशय जाणून घ्यायला तुला सवड नसेल किंवा इच्छा नसेल तुझी.पण त्यावर तुझ्या अंदाजाने अन्याय तरी करू नकोस.
>आपल्याला हवा तेव्हा  तिसरा माणूस न जाणे  हाच नरक!
> As you write more and more personal it becomes more and more univarsal
>

Friday 23 November 2012

महाराष्ट्र दर्शन --गो नी दांडेकर

पुस्तकाचे नाव  : महाराष्ट्र दर्शन
लेखक: गो नी दांडेकर
मृन्मयी प्रकाशन           पाने :२३८  
            गो नी दा खूप फिरलेयत आणि त्यावर त्यांनी अनेक छान   छान पुस्तक पण लिहिली आहेत.महाराष्ट्र दर्शन त्यापैकीच एक .महाराष्ट्र म्हणजे एक पुरुष ह्या दृष्टीकोनातून त्यांनी पुस्तक मांडलेले आहे .महाराष्ट्रातील ठिकाणे ,ऋतू ,सन,परंपरा,झाडे ,जाती,संत  इ वर वेगवेगळे लिहिलेले आहे.सगळे कसे मस्त.कुठल्या शब्दात ह्या पुस्तकाचे वर्णन करावे ते समजत नाही.गो नी दांच्या लेखनाला एक गोल्डन   टच असतो .पुस्तक कुणा व्यक्तीवर नाही,कुठलेही कथानक नाही .कुठलेही पाण उघडा आणि घ्या महाराष्ट्राचा अनुभव. अस्सल रांगडा महाराष्ट्र त्यांच्या शब्दाशब्दामधून डोकावतो.आपल्यासारख्या आताच्या काळातल्यानी तर जरूर पुस्तक वाचावे.वाचायच्या आधी पुस्तकात काय असेल अस वाटल होत,पण वाचून मजा आली .आता एवढ्या वर्षानंतर पूर्वी चा वर्णन केलेला महाराष्ट्र वाचताना रॉ महाराष्ट्र कसा होता त्याचा अनुभव येतो.आजकालच्या manupaletd जगात जगणाऱ्या साठी उत्तम अनुभव हे पुस्तक देत.

Tuesday 20 November 2012

शाळा --मिलिंद बोकील

पुस्तकाचे नाव :शाळा
लेखक: मिलिंद बोकील
मौज प्रकाशन  ,    पाने : ३०३
किमत:२०० रु
         २०१२ मध्ये शाळा चित्रपट (ह्या पुस्तकावर आधारित )आल्यामुळे ह्या वर्षी पुन्हा एकदा ह्या पुस्तकाची जोरदार चर्चा झाली .२००३ साली प्रकाशित झालेला हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झालंय.चित्रपट म्हणजे केवळ मुळ  कथेला ५०% च न्याय दिलाय अस माझ वैयक्तिक मत आहे.
   पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे.नववी त शिकणाऱ्या एका मुलाची हि कथा ७०-८० च्या दशकात घडलेली डोंबिवली मध्ये .त्या वेळे तरी डोंबिवली गावच होत.या वयात आणि त्या काळात जे काहि एखाद्या किशोरवयीन विद्यार्थ्याच्या बाबतीत  घडु शकेल त्याची जबरदस्त कहाणी म्हणजे शाळा .पुस्तक कुठेहि  खोटे वाटत नाही.सगळी पात्रे आपल्यासमोरच उभी आहेत असे वाटते.सर्व लेखन एकदम ओघवत्या भाषेत .सुममधे, डाऊट खाणे,  लाईन देणे ,इचीभन असे काहि खास शब्द लेखकाने वापरले आहेत.पुस्तकातली पात्र  म्हणजे मुकुंद , सुर्‍या, चित्र्या, सुकडी, केवडा,नरु मामा ,बहिण अंबाबाई सगळी पात्र झकास.पुस्तक एक उत्तम वाचनीय अनुभव.
            मुकुंद जोशी ची नववीतील हि कहाणी मग त्यात मित्र आहेत ,प्रेम आहे ,मस्ती आहे ,शिव्या आहेत,तत्कालीन परिस्तिथी चा वर्णन आहे , प्रेमासाठी केलेले उपद्व्याप आहेत ,नंतरची विलक्षण हुरहूर आहे.पुस्तक संपता संपता आपण पण मुकुंद जोशी आपलाच कुणी आहे असे समजू लागतो  मस्ट रीड .

परम मित्र -जयवंत दळवी

पुस्तकाचे नाव :परम मित्र
लेखक: जयवंत दळवी
majestic prakashan , प्रथम आवृत्ती :१९९४    पाने:२९६
किमत:२०० रु
    जयवंत दळवीनी ह्या  पुस्तकामध्ये त्यांच्या जवळच्या मित्राबद्दल लिहिलेले आहे.दळवी लेखक असल्यामुळे पुस्तकामधील बहुतेक व्यक्ती ह्या त्यांच्या  क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा प्रकाशन क्षेत्राशी  तरी संबधित आहेत . उदा. वि स खांडेकर,पु ला देशपांडे ,विजया मेहता ,अरविंद गोखले,जी ए कुलकर्णी ,जयंतराव साळगावकर ,मधु मंगेश कर्णिक ,दिनानाथ दलाल ,श्री पु भागवत ई .तसेच पुस्तकाचे शेवटी ४ मुलाखती आहेत (चंद्रकांत काकोडकर ,वि. स.   ई )
                 दळवींच्या लेखनशैलीमुळे पुस्तक वाचनीय झालेले आहे.कित्येक वर्णन केलेली मानसे आज हयात नाहीत पण त्यांच्याबद्दल वाचताना मजा येते,त्या व्यक्तींना जवळून बघितल्यासारखे वाटते . जी ए  ,जयंतराव साळगावकर ,पु ल,चंद्रकांत काकोडकरांची मुलाखत ई  लेख मस्त  जमले आहेत .लेख ५८ पासून ते ७० ते अगदी ९३ सालापर्यंतचे आहेत .ज्या व्लेखान्बद्दल फार कमी माहिती मिळेल त्यांच्याबद्दलची  कितीतरी माहिती लेखक त्यांच्या लेखातून देतात.पुस्तक वाचनीय आहे 

Thursday 15 November 2012

पानिपत असे घडले

पुस्तकाचे नाव :  पानिपत असे घडले

पब्लिशर : पुष्प प्रकाशन 

लेखक : संजय  क्षीरसागर 

पाने : ५८२       किंमत :५००रु (२०१२)

माहिती :  पानिपत बद्दल लोकांमध्ये कुतूहल,आकर्षण ,जिव्हाळा ,उत्सुकता हे सगळ   आहे .आतापर्यन्त ह्या विषयावर अनेक पुस्तक आली .विश्वास पाटील तर पानिपतकार ह्या नावाने ओळखले जातात.परंतु प्रस्तुत पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणजे लेखक कोणताही दुराग्रह मनात न ठेवता लेखन करतो.व जे काही लिहिलंय त्यासाठी शक्य तितके  पुरावे देतो मग ते कधी कधी ३-४ बखरी मधले असतात तर कधी शेजवलकर,जदुनाथासारख्या दिग्गजांचे असतात .त्यासाठीच हे पुस्तक तब्बल ५८२ पानाचे झालेय.पुस्तक काही कथा नसून पानिपत वर टाकलेला खराखुरा प्रकाश आहे.पण आपल्या इतिहासामध्ये बरेच पुरावे हे तितकेसे ग्राह्य देखील मानता येत नाहीत(काही बखरी मधील सनावळी व प्रसंग / वर्णन इ )त्यामुळे काही घटना ह्या केवळ assumptions करू शकतो.असे असले तरी निष्पक्ष पणे  लिहिलेले हे पुस्तक नक्कीच मस्ट रीड आहे .
                  केवळ पानीपत वाचलेल्यांनी जरूर वाचावे जेणेकरून एकांगी दृष्टी न राहता इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक होतो.काही घटनांचा सारासार विचार पण आपण करू शकतो .ज्या ठिकाणी उतारे,जुनी  पत्रे किंवा बखरीमधील काही भाग दिले आहेत तो भाग काहीसा वाचावायास कठीण जातो पण बाकी पुस्तकाची भाषा शैली व्यवस्थित आहे.

दास डोंगरी राहातो

पुस्तकाचे नाव : दास डोंगरी राहातो

पब्लिशर :  majestic prakashan

लेखक : गो नी दांडेकर

पाने :२७४

माहिती :  पुस्तकाचे नाव व मुखपृष्ट पाहून अंधुकशी कल्पना येते कि पुस्तक हे रामदास स्वामीवर आहे. महाराष्ट्रीयन संत मग ते संत तुकाराम असो किंवा रामदास स्वामी असो आजच्या पिढीमध्ये त्यांच्याबद्दलची माहिती फारच कमी आहे.ह्या पुस्तकात गो नि दा नी त्यांच्या ओघवत्या भाषेत रामदास स्वामीचे जीवनचरित्र रेखाटले आहे.त्यांचे बालपण,त्यानंतरच आयुष्य ,शहाजी  महारांजाची भेट ,शिवाजी महाराजाबद्दल प्रेम,त्यांच्या भेटी हे सर्व वाचनीय भाषेत लिहिले आहे.मधेच त्यांच्या काव्याची सुरेख मांडणी आहे तीदेखील कथेमध्ये येते .लिखाणाला ऐतिहासिक संदर्भ असल्यामुळे काही प्रसंग फुलवलेले आहेत पण त्यामुळे रामदास स्वामीं म्हणजे काय व्यक्ती होती ते समजण्यास मदतच होते.एकूण वाचनीय पुस्तक.अगदी त्यांच्या जिवनाच्या शेवटपर्यंत जरी लिहिलेल नसला तरी रामदास स्वामिना  आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या स्वरूपात आपल्या समोर मांडण्यात गो नि दा यशस्वी ठरले आहेत .

मराठी पुस्तक रिव्यु

मराठी मध्ये कित्येक  छान छान साहित्य  ,पुस्तक आहेत पण नावाखेरीज त्यांची जास्त माहिती उपलब्ध नाही .जसे एखाद्या इंग्रजी पुस्तकाचा सर्च केल्यावर हजारो पाने माहिती मिळते तसे मराठीत नाही त्यामुळे एखाद्या पुस्तकाचे नाव वाचल्यावर त्याबद्दल जुजबी माहिती मिळणे हि मराठी पुस्तकाच्या बाबतीत बर्याच वेळा अशक्य होऊन जाते.मी ह्या ठिकाणी काही  वाचलेल्या पुस्तकांची माहिती लिहेन .....हेतू हा कि आवडल्यास त्या पुस्तकांचे  वाचकाकडून वाचन होईल किवा त्यांना त्याबद्दल काही माहिती मिळेल ... कदाचित इतर काही माहितीही असेल .....स्वताच्या वाचनाच्या आठवणीच्या साठवणीसाठी देखील हा प्रयत्न .....चू भू द्या घ्या ......