Thursday 21 March 2013

मुंबईचे वर्णन --गोविंद नारायण माडगावकर (mumbaiche varnan-govind narayan madgaonkar)

पुस्तकाचे नाव:मुंबईचे वर्णन          गोविंद नारायण माडगावकर      समन्वय प्रकाशन                             पाने ३६०        किंमत:३५०

                            हे पुस्तक प्रथम १८६३ मध्ये प्रसिद्ध झाले .त्यानंतर जवळ जवळ १०० वर्षे ते दुर्लक्षित राहिले त्यानंतर २००१ साली ते पुनर्मुद्रित करण्यात आलेले आहे.न रा फाटकांनी प्रस्तावनेत लिहिलेय कि १८६३ मध्ये मुंबईची जी स्तिथी होती तिचे समग्र व सम्यक  दर्शन पुढच्या पिढीला घडावे अशी माडगावंकरांची आकांक्षा ह्या पुस्तकात सफल झालेली आहे.त्यांचे पुस्तकात तेव्हाच्या नागरिक जीवनाची बहुतेक सर्व अंगोपांगे आलेली आहेत.मुंबई ह्या नामांकित व वैभवाच्या शिखरावर चढलेल्या शहराचा साध्यंत वृतांत त्यांनी ह्या पुस्तकात  लिहिला आहे.
पुस्तकात एकूण १५ प्रकरणे  आहेत.त्यामध्ये  मग शहराची रचना,भाषा ,नामांकित स्थळे ,इंग्रजांची राजसत्ता ,मुळच्या स्थायिक लोकांची   माहिती,देवालायांची माहिती,रोगराई व तिची कारणे ,त्यावेळची शहराची रचना व माहिती (भायखळे ,माजगाव ,आर्थर बंदर,पोलोबंदर ,वाडिया बन्दर ,वरळी ,म्हातार पाखाडी,वालुकेश्वर ),आरमार,लष्कराची माहिती,लोकसंख्या,दुष्काळ व त्याचे निवारण,पारशी ,मुसलमान लोकांचे दंगे व त्यांचे निराकरण ,शहराचे उत्पन्न,नवे कर व त्यांची करणे,कोर्ट व न्यायव्यवस्था ,दवाखाने,पुस्तकालये,वेगवेगळे कारखाने व उद्योग धंद्यांची माहिती ई. काय काय लिहीलीले आहे.एकुणात त्यावेळच्या एकूण समाजव्यवस्थेच प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून दिसून येतं .इंग्रजांची व्यवहार कुशलता,राज्य करण्याची पद्धती ह्यावर लेखकाने खूपच positively लिहिलेले आहे. ते लेखनासाठी त्यावेळच्या उपलब्ध साधनाचा,बखरीचा  व स्वताच्या सुक्ष्म अवलोकनाचा वापर त्यांनी केलाय.छोटे मोठे किस्से ,वर्णने सांगून त्यावेळचे चित्रच डोळ्यासमोर उभे केलेले आहे .जुन्या मुंबईचा अभ्यास करताना हे पुस्तक म्हणजे मैलाचा दगडच आहे असे जरूर सांगावेसे वाटते.वेळोवेळी दाखले म्हणून उदाहरणे,बखरीतील उतारे,जुन्या जाणत्यांची मते,श्लोक,अभंग,कवने,लोकाच्या त्यावेळच्या खोट्या भ्रामक समजुती ई सारे पानोपानी दिलेले आहे.
     पुस्तक नक्कीच वाचण्यासारखे आहे.बरीच माहिती जी आपणाला किवा आपल्या वाड  वडिलांना देखील माहिती नाही ती यायोगे आपल्याला वाचायला मिळते.पुस्तकातील काही वाक्ये येथे देत आहे तेणेकरून वाचकांना अंधुकशी कल्पना येईल कि पुस्तकात काय आहे ते.
माहीम आणि मुंबई वेगवेगळी बेटे होती
मुंबईची चार पाच सुट्टी बेटे होती-कुलाबा,महालक्ष्मी,वरळी,माजगाव,शिव

महालक्ष्मीस जाण्यास पूर्वी होडी लागत असे ती आजच्या कामाठीपुरातून जात असे

मुंबईत पूर्वी लुटारू लोकांचे भय असल्यामुळे जेव्हा इंग्रज प्रथम इथे आले तेव्हे त्यांनी रात्रीचे आठ वाजले म्हणजे तोफ मारावी आणि लोकास बाहेर न पडण्याची इशारत करावी आणि पहाटेच्या पाच कळकाच्या घंटा  वाजल्या आणि अरुणोदय झाला कि फिरून तोफ मारून लोकांस बाहेर फिरायची मोकळीक आहे अशी सूचना द्यावी अशी वहिवाट घातली होती.

त्यावेळी शेतास व माडास  मासळीचे खत घालीत त्यामुळे शेतातून व बागातून दुर्गंधी सुटे व लोकास उपद्रव होई १७२० मध्ये सरकारने त्यास मनाई केली.

१६९९ मधील एका पत्रात गवर्नर लिहितो,एथील लोक पादचारी आहेत,बसाय्जोगा मुंबईत एकच घोडा असून गाडीस जुम्पायाजोगी बैलांची एक जोडी आहे .

कुलाबा हे मुंबईच्या दक्षिणेच्या शेवटास लहानसे ओसाड बेत असून ढोरे चरण्याचे ठिकाण होते.

शिवचा पूल १७९७त बांधला त्यास ५०५७५ रुपये खर्च झाला हे द्रव्य रयतेकडून उत्पन्न करून घेण्यासाठी अशी युक्ती काढली कि या पुलावरून गाड्या घोडे पालक्या जातील येतील त्यांजकडून याप्रमाणे कर घ्यावा --बैलाच्या गाडीस अर्धा आणा,घोड्यास चार आणे,एका घोड्याच्या गाडीस अर्धा रुपया ,आणि दोन घोड्यांच्या गाडीस एक रुपया याप्रमाणे कर द्यावा .कालांतराने जे द्रव्य हा पूल बांधावयास खर्च पडले ते भरपाई होऊन चुकले तेव्हा लागलेच कर घेणे बंद झाले.

लोहार लोकांचे कारखाने व लोखंडी समान विक्नार्यान्ही दुकाने आहेत म्हणून त्याला लोहार चाळ म्हणतात 

कोणास मोठे शासन करायांचे असल्यास शहरांत दवंडी पिटवून त्यास तरीपार करीत म्हणजे त्याला पनवेल ,अलिबाग,उरण एथे नेउन सोडीत आणि त्याला शहरात येण्याचा प्रतिबंध करीत.हे त्यावेळचे काळेपाणी!

No comments:

Post a Comment